Pages

Friday 27 January 2012

जागृती यात्रा भाग ५ : ग्रेट भेट.

         
        हुबळी-धारवाडची सेलको भेट व नंतर होन्नापुरातील ग्रामस्थांशी संवाद झाल्यावर आमची बस हुबळी स्टेशनकडे निघाली. दिवसभरात खूप काही गवसल्यासारखं वाटत होतं. बसमध्ये खिडकीजवळ बसून कर्नाटकातील खेडी बघत निघालो होतो. आपल्याकडे दिसतात तीच नेहमीची दृश्ये भराभर नजरेआड होत होती. हिरवीगार शेतं, रस्त्याने जाणारी गाईगुरे, डोक्यावर गवताचा भर घेऊन जाणाऱ्या बायका, चौकातल्या दुकानांवरचे कानडी फलक इत्यादी दृश्ये बघत असताना बसने धारवाडमध्ये कधी शिरकाव केला तेच कळलं नाही. धारवाडमध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच सेलकोच्या गतीला आर्थिक उर्जा देणाऱ्या कर्नाटक ग्रामीण विकास बँकेचं (KGVB) मुख्यालय दिसलं. एका ठिकाणी शाळा सुटली होती. पोरं घरी निघालेली. आमच्या सलग दहा-बारा गाडया दिसताच पोरं हात दाखवत ओरडायला लागलीत. लहानपणचे दिवस आठवलेत. ट्रेन मध्ये गेल्यावर डायरीत हे सगळं टिपायचं व त्यानंतर उद्याच्या भेटीचा गृहपाठ आजच करायचा हे पक्क केलं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या दिवशी बेंगलोरमध्ये आम्ही नारायणमूर्तींना भेटणार होतो. इन्फोसिसमधल्या या ग्रेट भेटीची सर्वांनाच उत्सुकता होती. हुबळी स्टेशनवर पोचलो. स्वयंसेवकांनी तिथून कुठल्या प्लाटफॉर्मवर जायचं ते सांगितलं. सगळेच कंटाळले होते व भूकही तडकून लागली होती. सर्व यात्री तसेच ट्रेनमध्ये गेले. १५-२० मिनिटानंतर फ्रेश झाल्यानंतर चहा, कॉफी व नाश्ता आला. गप्पा मारत, दंगा करत खाद्यपदार्थांचा पोट भरून समाचार घेतला. आमच्या ट्रेनमध्ये अनाउन्समेंटची सोय केली गेली होती. नाश्ता झाल्यावर साधारण दहापंधरा मिनिटांनी प्रेझेंटेशनसाठी यात्रींना चेअर कारमध्ये जमा होण्याची सूचना झाली. सेलकोवर अभ्यास करणारा ग्रुप पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन देणार होता. गटानुसार एका वेळी सव्वादोनशे यात्रींनी (राहिलेल्यांनी नंतर) त्यासाठी उपस्थित राहायचे व बाकीच्यांनी हा वेळ गृहपाठासाठी वापरायचा अशी सूचना होती. दोन तास धावत्या ट्रेनमध्ये प्रेझेन्टेशन ऐकायचं, मग प्रश्नोत्तरांचा वेळ, नंतर सूप, जेवण परत पुढील दोन तास दुसरा सेशन रात्रीचा फलाहार, दूध व मग झोप असं आमचं रोजचं 'धावतं' वेळापत्रक होतं. 

        दुसऱ्या दिवशी बेंगलोरच्या 'व्हाईटफिल्ड'वर उतरलो. तिथं सर्वांना " डू'ज व डोन्ट'ज "च्या सूचना मिळाल्या. आम्हाला घेऊन बसेस इन्फोसिसकडे निघाल्या. इन्फोसिसमध्ये पोचल्यानंतर प्रथम सर्वांची तपासणी झाली. नंतर इन्फोसिसचा भव्य कॅम्पस बघितल्यावर आम्ही सगळे सभागृहाकडे गेलो. नारायणमूर्तींचा कार्यक्रम दुपारच्या सत्रात होता. त्याअगोदर सकाळच्या सत्रात नंदिनी बैद्यनाथ यांचं 'Mentorship' या विषयावर व्याख्यान होतं. व्याख्यान ठीक-ठाक झालं. व्याख्यानंतर लंचसाठी इन्फोसिसकडून सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं. स्वादिष्ट व चवदार पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर परत सर्वजण सभागृहात जमले. ज्याला त्याला नारायणमूर्तींना जवळून बघायचे होते म्हणून पुढच्या सीट्स लगेच भरल्या. थोडया वेळातच नारायणमूर्ती आले. श्री. मूर्ती व्यासपीठावर " ते आले, त्यांनी पाहिलं व त्यांनी जिंकलं " असेच अवतरले आणि सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वागताची औपचारिकता झाल्यावर सभागृहात इन्फोसिसच्या उत्तुंग भरारीवर एक व्हीडीओ दाखवण्यात आला. साधारणता १५ मिनिटांचा हा व्हीडीओ आमच्या बरोबर नारायणमूर्तींनी एखाद्या लहान मुलाला असलेल्या जिज्ञासेप्रमाणे बघितला. 'Powered by Intellect, Driven by values' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या इन्फोसिसचा लेखाजोखा झाल्यानंतर श्री. मूर्तींची मुलाखत होणार होती. पण औपचारिकता म्हणून श्री. मूर्तींनी छोटेखानी भाषण केले. भाषणात त्यांनी सर्वप्रथम सर्व यात्रींचे स्वागत केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या यात्रींमध्ये ग्रामीण-निमशहरी व महिला यात्रींची संख्या सुखावणारी आहे, असे त्यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले. 
    मुलाखतीदरम्यान बोलताना नारायण मूर्ती.
                                                                   मुलाखतीत नारायणमूर्ती अनेक विषयांवर भरभरून बोलले. त्यात त्यांनी त्यांची विचारसरणी  कम्युनिझम ते कॅपिटालिस्ट कम्युनिझमपर्यंत कशी बदलत गेली ते विस्तृतपणे सांगितले. इन्फोसिसबद्दल बोलताना ते म्हणाले " इन्फोसिसच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा सगळा प्रवास करताना आम्ही मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. मागील आर्थिक मंदीत इन्फोसिसव्यतिरिक्त इतर सर्व आयटी कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या, इन्फोसिसनेही तसे करावे यासाठी त्यांनी दडपण आणले. पण इन्फोसिसने शेवटपर्यंत आपला मुद्दा सोडला नाही. बाकीच्या आयटी कंपन्यांना नंतर त्याचा फटका बसला. मग इन्फोसिसची कृती योग्य असल्याचे मत अनेक कंपन्यांनी प्रांजळपणे आमच्याकडे व्यक्त केले." यात्री जाणू इच्छिताहेत की तुमचे आदर्श कोण आहेत? असा प्रश्न राजने विचारल्यावर सेकंदाचाही विलंब न लावता मूर्ती म्हणाले " महात्मा गांधी. गांधीजी हे नेहमीच माझे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. कारण त्यांनी जो बदल तुम्ही पाहू इच्छिता तो बदल तुम्ही स्वत:च व्हा असं सांगितलं होतं. तो बदल मी झालो आणि आज इन्फोसिस इथे आहे." हे सांगताना त्यांच्या प्रत्येक शब्दात इन्फोसिसबद्दलचा त्यांना असलेला अभिमान जाणवत होता. विषयांतर करताना त्यांनी इतर बाबींवर असलेली त्यांची मते मांडली. त्यामध्ये मग आंत्रप्रीनरशिप, आंत्रप्रीनर व मूल्यव्यवस्था,ग्रामीण विकास, महिलांचा अनेक गोष्टींतील सहभाग, इतर विकसित देश, सध्या चर्चेत असलेला भ्रष्टाचार, टीम अण्णा व त्यांचे सहकारी या विषयांचा समावेश होता. प्रश्नोत्तराच्या तासात एका मुलगीने विचारलेल्या 'इन्फोसिस सोडताना तुम्हाला काय वाटलं?' या प्रश्नाला त्यांनी " इन्फोसिस मला माझ्या मुलीसारखीच होती. मुलीचं लग्न होताना ती घर सोडून जात असते, त्यावेळी प्रत्येक बापाला जसं वाटतं तसेच भाव इन्फोसिस सोडताना माझ्या मनात होते.", असं भावूक उत्तर दिलं.  
बेंगलोरमधील पॅनेल डिस्कशन.
    
       नारायण मूर्तींच्या मुलाखतीनंतर जागृती यात्रेच्या संपूर्ण प्रवासातील पहिले पॅनेल डिस्कशन इन्फोसिसमध्ये आयोजित करण्यात आले. विषय होता- 'Technology startups and social impacts'. तंत्रज्ञानावरील एवढा चांगला विषय, प्रचंड उर्जेने भरलेले उद्याचे हे तीन-चारशे तंत्रज्ञ व जिथं हे सारं पार पडतंय तो इन्फोसिसचा कॅम्पस हा जुळून आलेला एक सुंदर योग होता. पॅनेल डिस्कशनमध्ये सहभागी होणारे तज्ञ होते- फणींद्र सामा, वीर कश्यप व अभिनव सिन्हा. हे तिघेही तरुण तंत्रज्ञ. यांतला फणींद्र अनेकांना माहित असेल. प्रसिद्ध 'रेड बस'चा सीइओ. रेडबसने बसची तिकिटे विकण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर केला आहे. वीर कश्यप हा 'बाबाजॉब.कॉम'चा सीओओ तर अभिनव हा 'इकोपे'चा संस्थापक आहे. बाबाजॉब.कॉम ही वेबसाईट आपलं दैनंदिन जगणं सोपं करणाऱ्या मनुष्यबळाचा म्हणजे कामवाली, ड्रायव्हर इ.चा पुरवठा वेबसाईट वरून ग्राहकांना करते. तर अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना बँकेत खाते उघडण्यास अनेक अडचणी येतात म्हणून अभिनवने इकोपेच्या माध्यमातून त्या गरजूंसाठी सर्व बँक सुविधा देणारे एक मॉडेल उभे केले आहे. पॅनेल डिस्कशनमध्ये तिघांचीही वेगवेगळी मते,वेगळे दुष्टीकोन व त्यांनी एकमेकांशी केलेले वादविवाद यांमुळे ते ऐकताना मजा आली. कोणतेही तंत्रज्ञान असो, ते वापरणाऱ्याच्या दैनंदिन जगण्यावर त्याचा बराच फरक पडून जातो, या गोष्टीवर तिघंही ठाम राहिलेत. मग प्रत्येकाने आपापल्या माहितीतील उदाहरणे देवून ते पटवण्याचा प्रयत्न केला.पॅनेल डिस्कशन खूप छान झालं. केवळ नारायणमूर्तीच नव्हे तर या तिघा तरुण तंत्रज्ञांनीही आमच्यासमोर तंत्रज्ञाच्या माध्यमातून गरजू व अल्पशिक्षित लोकांसाठी तुम्ही भरपूर काही करू शकताय हा संदेश ठेवला होता. हा संदेश त्यांनी कोणत्या भाषणातून दिला नाही तर त्यांच्या कृतीतून त्यांनी प्रत्यक्षात उतरवला होता. या 'ग्रेट' चौघांना भेटून झाल्यावर आम्ही इन्फोसिसचा निरोप घेतला. आता पुन्हा बस, पुन्हा स्टेशन, तीच ट्रेन, तेच शेड्युल फक्त ठिकाण नवं.
       

Tuesday 24 January 2012

जागृती यात्रा भाग ४: सेलको: जगणं उजळवताना..

       यात्रेत जमलेले सर्व यात्री हे एकाच मांदियाळीतले होते. या साऱ्यांच्या तोंडी स्वत:च्या देशाच्या भावी विकासाचं सुप्त होतं. भारताच्या विविध भागांतून आलेली ही टीम सारा भारत बघायला,शोधायला जाते हे खरंय, पण त्याच्याच अगोदर या ट्रेन मध्ये विविधरंगी-विविधढंगी भारत जमलेला होता. ट्रेनमध्ये अगदी पहिल्या दिवशीच भारताच्या २४ राज्यांतले व २३ देशातील असे ४७ रंग एकमेकांत लीलया मिसळले. पहिला दिवस ही पुढच्या चौदा दिवसांची रिहर्सल होती. पुढील चौदा दिवस ट्रेनमध्येच अर्ध्यापेक्षा अधिक वेळ रहायचं होतं व म्हणून या नव्या रुटीनला रूळावं म्हणून पहिला दिवस सर्वांनी जागृतीच्या शेड्युलनुसार ट्रेनमध्येच घालवला. पहिल्या दिवशीच पुढच्या चौदा दिवसांच्या खडतरपणाची जाणीव झाली. जागृती ही एक 'अ‍ॅडवेंचर जर्नी' असल्याने मनाची तशी तयारीही झाली होतीच. दुसऱ्या दिवशी यात्रेतली पहिली भेट आम्ही देणार होतो हुबळी-धारवाड व तिथून काही अंतरावर असलेली खेडी. बेंगलोरमधील 'सेलको' नावाच्या सौरउर्जेच्या क्षेत्रात लक्षणीय काम करणाऱ्या या कंपनीची खेडयातील कामगिरी, त्यांनी तिथं उभारलेलं आर्थिक मॉडेल व गावकऱ्यांशी संवाद असा हा तिहेरी कार्यक्रम होता. त्याअगोदर सेलकोची सुरुवात, तिचं नेमकं काम इ. बाबी सर्वांना माहिती व्हाव्यात यासाठी सेलकोतर्फे धारवाडच्या कृषी विद्यापीठात सेमिनार आयोजित केला होता.

        सध्या सेलको ही सौर उर्जेच्या क्षेत्रात काम करणारी एक नावाजलेली भारतीय कंपनी आहे. तीची स्थापना १९९५ मध्ये श्री.हरीश हांडे यांनी केली. तेव्हापासून सेलको सौरवीज व सौरवीजेशी संबंधित इतर सेवा प्रामुख्याने कर्नाटक व दक्षिण भारतातील ग्रामीण भागात देत आली आहे. फक्त वीजच नव्हे तर त्यच्यशी संलंग्न तंत्रज्ञानाची योग्य माहिती, आर्थिक साहाय्य व नंतर कार्यक्षम सेवा देणे ही आता सेलकोची ओळख बनलेली आहे. सेलकोने अनेक घरांना फक्त वीजच नाही तर या क्षेत्रातील लघुद्योगसुद्धा दिलेले आहेत. हरीश हा आयआयटी खरगपूरचा एनर्जी स्टडीजमधला इंजिनिअर. पुढे एमएस व पीएचडी त्याने अमेरिकेतल्या म्यासाच्युसेट्समधून केल्यानंतर तिथलं ऐशारामी जीवन नाकारून भारतात परत येऊन सेलकोची स्थापना केली. सौरउर्जेवर काम करणारी कंपनी सुरू करायची हे ठरल्यानंतर ग्रामीण भागात तिची उपयुक्तता कितपत असेल हे अभ्यासण्यासाठी त्याने बेंगलोरजवळच्या एका खेडयातील शेतकऱ्याच्या घरी सौर-व्यवस्था बसवली. थोडया दिवसांनी हरीश व त्याचे दोन सहकारी त्या शेतकऱ्याकडे पैसे आणण्यासाठी गेले असता, काही कारणास्तव त्यांना पैसे मिळाले नाहीत. तिघांकडे मिळून तेव्हा चाळीस रूपये, त्यात मग तिघांनीही कसेबसे जेवण उरकले. आता बेंगलोरला परत जायचा प्रश्न. एका अनोळखी खेडयात एवढे पैसे कुठून मिळणार? हरीशचे दोन्ही सहकारी अल्पशिक्षित. ते इकडं-तिकडं फिरुन कुठं काही काम मिळंतय का बघू लागले. बेंगलोरवरुन दक्षिणेत कुठंतरी जाणाऱ्या बसेस तिथं जवळपास थांबायच्या. हरीशच्या दोन्ही सहकाऱ्यांनी तिथं हमाली केली व पैसे मिळवले. अर्थार्जन व शिक्षण यांचा वानगीदाखलही संबंध न दर्शवणारा तो प्रसंग हरीशच्या मनावर कायमचा कोरला गेला आणि म्हणूनच उत्तमोत्तम कौशल्ये असूनही फक्त अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्याने सध्याच्या अर्थकारणात मागे पडल्यामुळे हिणवल्या जाणाऱ्या या वर्गाकडे हरीशचा ओढा जरा जास्तच आहे.

       हुबळीच्या जंक्शनवर उतरल्यावर बसने आम्ही धारवाडच्या कृषी विद्यापीठाकडे प्रयाण केले. विद्यापीठाच्या आवारात सेलकोकडून आमचे स्वागत करण्यात आले. हरीश या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. पण आमच्या पुढच्या प्रवासात अहमदाबादमध्ये आम्हाला तो भेटला. कार्यक्रमात सेलकोचे आर्थिक संचालक श्री.उडुपा यांनी कंपनीचा सारा प्रवास आमच्यासमोर मांडला. सेलकोवरील त्यांचं भाषण माहितीपूर्ण होतं. श्री.उडुपा हे पूर्वी कर्नाटक ग्रामीण विकास बँ
केचे (KGVB) चेअरमन होते. १९९५ मध्ये सेलकोची स्थापना झाल्यावर हरीशकडे कोणत्याच प्रकारचं आर्थिक पाठबळ नव्हतं. तरीसुद्धा कर्नाटकतल्या गावांगावांतून, खेडयाखेडयातून सौर उर्जेच्या मॉडेल्सचे डेमोज देत, त्याचे फायदे सांगत फिरत होता. पण आपल्याकडे सेल्समन घरी आला की लोकांना मनात शंका येते की हा काहीतरी गळ्यात मारायला आलांय. हरीशच्या बाबतीतही तेच झालं. त्यात अगोदर तिथं शासकीय यंत्रणा हा सौर प्रकल्प राबवायच्या. त्यांच्या कामांचा निकृष्ट दर्जा, अनियमित देखभाल, काही ठिकाणी खंडित सेवासुद्धा आणि सोलार पनेल्सची न परवडणारी किंमत यामुळे तेव्हा सौर व्यवस्था हा प्रकार आपली विश्वासार्हता गमावून बसला होता. या साऱ्यामुळे हरीशसमोर मोठी आव्हाने उभी होती. या आव्हानांना संधी समजत सेलकोने मग वर्षानुवर्षे दारिद्ऱ्याने गांजलेल्या या जनतेसाठी आपले आर्थिक मॉडेल उभारले. खेडयातल्या या अल्पशिक्षित व गरीब जनतेपर्यत सौर व्यवस्थेची सोय पोचली तर लोडशेडींगच्या त्रासातून त्यांची सुटका होइल हा हरीशचा विचार. मग हरीशने ग्रामीण अर्थव्यवस्था व तिचे बेभरवशाच्या शेतीवरील अवलंबित्व समजून घेतले. ग्रामीण जनतेच्या या अशा आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यावर यांना सौरव्यवस्था खरेदी करण्यासाठी बॆंकेचं आर्थिक साहाय्य, प्रतिमहिना अल्प हप्ता म्हणजे अगदी १० रुपयांपसून ते ३५० रुपयांपर्यंत, सौर व्यवस्थेची कायमस्वरुपी विनाशुल्क देखभाल व दुरुस्ती, तसेच कर्जाच्या परतफेडीची बहुकालीन मुदत अशा कल्पना राबवायला सुरुवात केली. या गरीब शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी मघाशी उल्लेख केलेल्या श्री. उडुपांच्या कर्नाटक ग्रामीण विकास बंकेने त्यावेळी हरीशला खूप मदत केली. आता तर निवृत्त झाल्यावर त्यांनी सेलकोचे पूर्ण वेळ संचालक म्हणून काम पाहायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बी-स्कूलमधल्या शिकलेल्या एखाद्या आंत्रप्रीनरसारखे ’डिमांड मार्केट’ शोधून प्रोडक्ट विकण्याऐवजी, जिथे आपल्या प्रोडक्टला डिमांडच नाही, चक्क तिथे तो प्रोडक्ट यशस्वीरित्या विकायचा व चक्क डिमांड मार्केट तयार करायचे, हे विशेषच म्हणायला हवे. बँकांची व शासकीय यंत्रंणांची आर्थिक मदतीस अनिच्छा असतानाही हरीशने सेलकोला यशस्वी करुन दाखवले.


   
यात्रींसमोर बोलताना श्री. उडुपा
    श्री. उडुपांच्या भाषणानंतर ’अभ्यासलेल्या प्रतिरुपाचा परिणाम’(Case study of an Impact) या आमच्या प्रकल्पांतर्गत आम्ही धारवाडजवळच्या ’होन्नापूर’ या गावात तिथंल्या गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेलो. सेलकोचा त्यांच्या वर्तमान वीजेच्या स्थितीवर चांगला परिणाम असल्याचे अनेकांनी मान्य केले. तिथल्या सौर-व्यवस्था बसवलेल्या एका घरात आम्ही काही यात्री गेलो. गृहिणीशी बोलताना कळलं की, सेलकोचे बरेचसे ग्राहक प्रतिदिन १०० रुपयांपेक्षाही कमी उत्पन्नात जगत असतानादेखील त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी अठरा-वीस हजारांची सौर-व्यवस्था बसवून घेतलेली आहे. ज्यातले ९५% रक्कम बँक ग्राहकाला देते. हरीश अहमदाबादमध्ये आम्हाला सांगत होता " देशभरात आतापर्यंत अशाच १,२०,००० घरांमध्ये सेलकोनं आपली सौर-व्यवस्था बसवली आहे. सध्यातरी भारतात फक्त कर्नाटक व गुजरात या दोन राज्यापर्यंत हा विस्तार मऱ्यादीत आहे. या दोन राज्यांत मिळून सेलकोच्या २५ शाखा आहेत. सौर व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॆटरीजचा लघुद्योगही सेलकोने रस्त्यांवरील विक्रेत्यांना घेउन सुरु केला आहे."
       स्वत:बरोबर तळागाळातल्या अल्पशिक्षित ग्रामीण जनतेचा विकास साधण्याचा चंग कर्नाटकतल्या हंडट्टू नावाच्या छोट्या खेडयात जन्मलेल्या हरीश हांडे या ’सोशल आंत्रप्रीनरने’ बांधला आहे.  आपल्याला ज्या भागात काम करायचे आहे, तिथल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा सगळ्याच व्यावसायिक कंपन्या विचार करतात पण तो फक्त स्वत:च्या फायद्यासाठी. त्यांच्या तिथं आपलं उत्पादन खपवण्यासाठी. (उगाच खेडयातली पोरं-पोरी एक रुपयाचा शांपू आणि ५ रुपयांची कॅडबरी घेत नाहीत.) त्यांच्या अभावांचा, त्रुटींचा विचार करुन तिथं वेगळं असं मॉडेल उभा करणारा हरीशसारखा एखादा रोल मॉडेल वेगळाच. ग्रामीण भारताशी हरीशची नाळ जोडली गेली आहे. ’भारता’ला बरोबर घेउन चालल्याशिवाय ’इंडिया’ महासत्ता बनू शकणार नाही असं तो म्हणतो व त्या भारताकडे होत असलेलं दुर्लक्ष त्याला चीड आणतं. यू ट्यूबवरील त्याचे हे व्हिडीओज बघितले तरी हे लक्षात येतं. अंधारात ठेचकळल्याशिवाय उजेडाची किंमत कळत नाही. हा ’असा’ अंधार आयुष्यात येणंही गरजेचं असतं. हरीशच्या आयुष्यात तो आला. सहा महिने श्रीलंकेत व दोन वर्षे कर्नाटकात झोपडीत अशी तब्बल अडीच वर्षे अंधारात काढल्यावर त्याला ’प्रकाश’ म्हणजे काय ते कळलं. आशियाचं नोबेल समजल्या जाणाऱ्या मॆगसेसे पुरस्कार व दोनदा अ‍ॅश्डेन पुरस्कार मिळवल्यानंतरही आपलं काम आता कुठं सुरु झालंय असं त्याला वाटतंय. कारण अजूनही ४० कोटी भारतीय अंधारात राहतात, त्यांचं घरंच नव्हे तर जगणं उजळवणं हा हरीशसाठी खरा मॆगसेसे असेल.

Thursday 19 January 2012

जागृती यात्रा भाग ३: एका सुप्ताची सुरुवात.

              
          ...अखेर यात्रेचा दिवस उजाडला. भारताच्या २४ राज्यांतून इतर २३ देशांतून आलेले यात्री सकाळी अकराच्या दरम्यान आयआयटी मुंबईच्या सभागृहाबाहेर जमले होते. सर्व चेहरे एकमेकांना नवीनच. काही ठिकाणी ओळख परेड सुरू होती, तर काही ठिकाणी हातात नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन नुकताच जमलेला घोळका. कुणी फोनवर बोलण्यात मग्न होते, तर कुणी रजिस्ट्रेशन करण्यात व्यग्र. असा हा सारा विखुरलेला घोळका जेवणाच्या अनाउन्समेंटने एकत्र आला. दुपारच्या जेवणानंतर लगेच ’जागृती यात्रे’च्या उदघाटनाचा कार्यक्रम सुरू होणार होता. सर्वांचं जेवण आटोपलं. हळूहळू एकेक पाय सभागृहाकडे वळू लागले.
                    
             दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झालीउदघाटक होते जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर. माशेलकरांनी यात्रेचं औपचारिक उदघाटन केलं. पण सगळ्यांना आतुरता होती, ती त्यांच्या भाषणाची. सर्व यात्रींसमोर माशेलकरांनी छान भाषण केले. त्यांच्या भाषणात ’क्रिएटिव्हिटी,एक्सलन्स, इंडियन माइंड्स व एज्युकेशन’ या चारींचा सुंदर मिलाफ जमला होता. सृजनशील उद्योजकता ही विकासासाठी गरजेची असून तिला झपाटलेपण, करुणा व निर्माणशीलता (Passion, Compassion and Innovation) या तीन गोष्टींची जोड द्यायला हवी हे त्यांनी नमूद केले.

             डॉ.माशेलकरांच्या भाषणानंतर जागृतीच्या शशांक मणींनी उपस्थित यात्रींशी हसत-खेळत दिलखुलास संवाद साधला. शशांकनी त्यांच्या भाषणात सुरुवातीला यात्रेचं स्वरूप स्पष्ट केलं. तसेच यात्रींच्या निवडप्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगितलं. ग्रामीण व शहरी या विभाजनाबद्दल बोलताना ते म्हणाले "तुम्ही कुठून आलाय हे कधीच विसरू शकत नाही. आपण प्रत्येकजण आपल्या मुळांशी (Roots) घट्ट जोडले गेलेलो असतो व त्या मुळांचं नातं विषद करण्यासाठी ग्रामीण व शहरी हे विभाजन आवश्यक आहे". शशांकचं हे बोलणं ऐकताना प्रत्येकाला हे तर आपल्याच मनातलं असं वाटत होतं.
पुढे १९९७ ला शशांक व काही युवकांनी पुढाकार घेवून काढलेली आझाद भारत रेल यात्रेची माहिती शशांकने सांगितली. त्यावर एक छोटासा व्हीडिओ बघायला मिळाला. पुढची पिढी सुसंस्कृत व्हावी, यासाठी आधीच्या पिढीला आपल्या इच्छाकांक्षांचा त्याग करावा लागतो. मगच पुढचं जनरेशन, पुढची पिढी घडते, निर्माण होते आणि पर्यायाने देश घडतो. प्रत्येक पिढीच्या बाबतीत हे घडतंच असतं आणि आता तुमच्या पिढीसाठी आम्हाला आमच्या वैयक्तिक इच्छाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागणार आहेत. शशांकचे  हे शब्द सर्वांना चार्ज करणारे होते.  यात्रेचा मोटो स्पष्ट करताना जेव्हा शशांकने म्हटले "We want to discover one India, but we discovered many Indians.", तेव्हा तर टाळ्यांचा कडकडा झाला. शशांकचं म्हणणं हे की आजचा ३५% भारत हा गरीब आहे व त्या गरिबीत ६० कोटीं भारतीय आपले दिवस कसेतरी काढताहेत. त्या ६० कोटींना हेतू हवाय व हा हेतू त्यांना उद्यम जनित विकासाच्या माध्यमातून साधला जाईल.  भाषणाच्या शेवटी ' यात्रा हा तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा अनुभव असेल . या यात्रेत इतरांकडून शिका आणि देशाचा शोध घेत असतानाच स्वत:चा शोध घ्यायलाही विसरू नका' असा मैत्रीपूर्ण वडिलकीचा सल्लाही शशांकने दिला. 

            तासाभराच्या ब्रेकनंतर संध्याकाळी 'संगीत-रजनी'ला सुरुवात झाली. प्रसून जोशीचा कवितांचा व तौफिक कुरेशींचा मौखिक तबलावादनाचा कार्यक्रम यामध्ये होता. प्रसूनच्या साऱ्याच कविता आशयपूर्ण. साधा आणि तरल भाव. 'दिल को छु गया ' म्हणतो ना त्या शैलीतल्या. तौफिक  कुरेशींनी आपल्या मौखिक तबलावादनाने तर अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. कार्यक्रमानंतर तौफिक व प्रसून यांच्या हस्ते फ्लाग ऑफ समारंभ झाला व त्यांनी झेंडा यात्रींकडे सुपूर्द केला. रात्रीच्या  जेवणानंतर यात्रींच्या बसने कुर्ल्याकडे प्रयाण केले. दीडदोन तास सर्वजण प्लाटफॉर्म  वर बसूनच होते.  रात्री एकच्या सुमारास जागृतीची 'नॅशनल ओडिसी ट्रेन ' आली आणि सर्वांनी एकंच कल्ला केला. शिट्ट्या, दंगा, ओरडणे आणि उधाण..सर्वांना अगोदरच योग्य बोगी व कंपार्टमेंटचं वितरण करण्यात आलं होतं. आत गेल्यावर स्थिरस्थावर होण्यास जवळपास अर्धा तास गेला. नंतरचा अर्धा तास सहकारी यात्रींची ओळख, इतर गप्पा आणि फोटो सेशन. हळूहळू सगळेजण झोपण्याच्या तयारीला लागले. रात्री दोन वाजता ट्रेन निघाली-साडे चारशे यात्रींना घेवून एका नव्या प्रवासाला! कदाचित भविष्यातल्या एका दीर्घ आरंभाला! जवळपास सर्व झोपले होते. मला प्रसून जोशीचं आमच्या या यात्रेसाठी लिहिलेलं गीत आठवायला लागलं..  
                                           कुछ बदल रहा कुछ बदलेगे
                                           तब बदलेगा जब बदलेगे
                                           कुछ देखा है कुछ देखेंगे
                                           कुछ लिखा है कुछ लिख देंगे
                                           यारों चलो बदलने की रुत है
                                           यारों चलो सँवरने  की रुत है
                                           हवा कह रही तू ठहरना नही 
                                           गगन कह रहा तू पिघलना नहीं
                                           जमीं कह रही मुझको छूके देख
                                           आँखे मिला सच से डरना नहीं.







Wednesday 18 January 2012

जागृती यात्रा भाग २: यात्रेबद्दल थोडसं..

         गेल्या ब्लॉगमध्ये ज्या युवकांचा उल्लेख केला होता, ते ज्या ज्ञात-अज्ञात भारतप्रवासासाठी जमले होते, तो प्रवास म्हणजे "जागृती यात्रा". जागृती यात्रा ही खंड:प्राय व धर्मनिरपेक्ष भारताची शोध व परिवर्तन यात्रा आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातील 'जागृती सेवा संस्थान'कडून दरवर्षी आयोजित केली जाते. राजकीय-सामाजिक,विज्ञान-तंत्रज्ञान व आर्थिक गोष्टींची उत्तम जाण असलेले ध्येयवादी युवक-युवतींची निवड या यात्रेसाठी केली जाते. यात काही आंतरराष्ट्रीय यात्रींचाही सहभाग असतो. जागृती यात्रा ही भारतातील एवढया मोठया प्रमाणावर होणारी एकमेव वार्षिक रेल्वे यात्रा आहे. दरवर्षी ही यात्रा मुंबई येथून २४ डिसेंबरला सुरु होते व साधारणत: जानेवारीच्या दुसऱ्या आठवडयात संपते. या ध्येयवादी युवक-युवतींना उद्योगाच्या माद्यमातून देशासाठी काहीतरी विधायक कार्य करायला प्रेरित करायचं, हा या यात्रेचा हेतू असतो. या यात्रेची ट्यागलाईन एका वाक्यात सांगते त्याप्रमाणे - "1 Train | 12 Destinations | 15 Role Models |15 Days | 450 Youths | 9000 kms ...A Journey of discovery and transformation..."
         
       'जागृती'चा हेतू 'त्या' साठ कोटी भारतीयांवर प्रकाश टाकण्याचा आहे, जे प्रतिदिन रु.४०-१२० च्या दरम्यान उत्पन्नामध्ये आपली गुजराण करतात. या प्रतिदिन उत्पन्नात जगणाऱ्या मनुष्यबळामध्ये कौशल्य-विकास व उद्यम जनित विकासाच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न 'जागृती' करत आहे. म्हणजे उद्योगावर आधारित व्यक्तीचा,समाजाचा व एकूणच देशाचा विकास हा जागृतीचा मंत्र आहे. इथे 'जागृती'चा दृष्टीकोन भारतातील मध्यमवर्गीय तरुणांची मानसिकता 'नोकऱ्या शोधणारे' पासून 'नोकऱ्या देणारे' बनावी हा आहे. कदाचित त्यामुळे त्यांच्या (तरुणांच्या) बुद्धिमत्तेला व कौशल्यांना न्याय देणारा पर्याय आपोआपच उपलब्ध होईल. वर उल्लेख केलेला ६० कोटींचा वर्ग हा ग्रामीण-निमशहरी भागात राहत असल्याने या यात्रेत देशातील ग्रामीण-निमशहरी युवावर्गाचं वर्चस्व दिसून येतं. यंदाच्या यात्रेत ६३% ग्रामीण-निमशहरी यात्री होते तर एकूण यात्रींपैकी ४०%मुली होत्या.  ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त यात्री हे २०-२५ वयोगटातले होते तर सर्वाधिक वय असलेले (अंदाजे ४५ ते ४८) काही यात्रीसुद्धा यामध्ये होते.                                                      

       जागृतीचा 'उद्यम जनित विकासा'चा दृष्टीकोन अफलातून आहे. जागृतीच्या मते भारतीय जनतेच्या आर्थिक स्थितीची तुलना एखाद्या हिऱ्याच्या स्वरूपाशी केली जाऊ शकते. सोबतच्या चित्रात 
दाखवल्याप्रमाणे भारतीयांची आर्थिक क्षमता तीन भागांत विभागली जाऊ शकते, ज्यात दोन्ही बाजूला त्रिकोण व मध्ये आयत अशी हिऱ्याची रचना आहे. पहिला त्रिकोण त्या २५ कोटींचा- ज्यांचं प्रतिदिन उत्पन्न रु.२०० पेक्षा जास्त आहे तर शेवटचा अतिगरीब लोकसंख्येचा - ज्यांचं प्रतिदिन उत्पन्न रु.४० पेक्षा कमी आहे आणि मधला आयत- आपण मघापासून बोलतो आहोत त्या ६० कोटींचं प्रतिनिधित्व करतो. (चित्रात ५० कोटी दाखवलंय मात्र सुधारित सांख्यिकीनुसार हे प्रमाण ६० कोटींचं आहे.) जागृतीचे लक्ष्य आयतातले 'ते' ६० कोटी आहेत, ज्यामध्ये २० ते ३० या वयोगटातला युवावर्ग मोठया प्रमाणात आहे. २०२५पर्यन्त या आयतात अजून २२ कोटींची भर पडेल. हे तरुण अगतिक नाहीत,यांच्या डोक्यावर छप्पर आहे, खायला अन्न आहे त्यांच्याकडे फक्त जगण्याचा हेतू नाही. रोजगार नाही. जागृतीचं ध्येय त्यांना तो हेतू देणारे 'हात' निर्माण करण्याचं आहे.

       जागृती यात्रा हा एक अद्वितीय अनुभव असतो. जेव्हा देशातील साडेचारशे समविचारी नवयुवकांची फौज एकत्र येते, तेव्हा त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम हा नक्कीच ठसा उमटवणारा असतो. यात्रेमध्ये जसे एमएनसीतील दांडगा अनुभव असलेले अनेक आयआयएम-आयआयटीयन्स होते, तसे अगदी भारतातल्या सर्वाधिक मागास व दुर्गम अशा 'कालाहंडी' जिल्ह्यातून आलेले काही यात्रीही होते. देशाच्या चारीही भागातून इथे एकवटलेले हे युवक नारायणमूर्तींपासून ते हरीश हांडे या उद्योजकांना तर जो मडीएथपासून ते अंशू गुप्ता या समाजसेवकांना भेटणार होते. 'जिंदगी मिलेगी ना दोबारा'सारखं पुन्हा हे सारं अनुभवायला मिळेल की नाही माहित नाही म्हणून जॉब्स सोडून येणारे जसे यामध्ये होते, तसे आपल्या विद्यापीठीय परिक्षांवरती या सेमिस्टरपुरतं पाणी सोडून येणारेही होते. एवढंच कशाला, जागृतीच्या या यात्रांसाठी पूर्ण वेळ ज्या लोकांनी वाहून घेतलंय त्यांनी तरी यापेक्षा वेगळं आतापर्यंत काय केलंय? जागृतीचे चेअरमन शशांक मणी हे आयआयटी खरगपूरमधील  इंजिनिअर. बी.टेकनंतर त्यांनी लंडन मधून एमबीए केलं. तिथं काही काळ काम केल्यानंतर भारतात येऊन त्यांनी अशा यात्रेची संकल्पना राबवली. १९९७ साली भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून अशीच यात्रा त्यावेळी त्यांनी  'आझाद हिंद रेल यात्रा ' या नावाने काढली होती. नंतर काही कारणाने यात्रेत खंड पडला. आता २००७ पासून मात्र दरवर्षी ही यात्रा राबवली जात आहे.

        नुसतं घर नाही तर देश आणि समाजसुद्धा "बांधावा" लागतो. भारत या विकसनशील देशाला असे अनेक 'हात' आपापल्या पातळीवर बांधताहेत. अगदी रोटी,कपडा,मकानपासून ते शिक्षण,आरोग्य व पाण्यापर्यंत. जागृती यात्रा म्हणते तसं "Building India through enterprise"- ती उद्योगाच्या माध्यमातून  नवयुवकांना व पर्यायाने देशाला बांधतेय. कुणी सांगावं, कदाचित जेव्हा उद्याचं एखादं इन्फोसिस हे ओरिसातील 'बटापल्ली' या आदिवासी गावात असेल किंवा उद्याचं 'ताज हॉटेल' हे एखाद्या दुर्गम खेड्यात जेव्हा वसलेलं असेल, तेव्हा ती खरी "जागृती" असेल. जागृतीच्या या आशेला सकारात्मक उर्जेचं बळ मिळो,ही सदिच्छा.

Thursday 12 January 2012

जागृती यात्रा भाग १: प्रवास एका प्रवासाचा...


         दिल्लीच्या IGIB (Institute of Genomics and Integrative Biology) त मायाक्रोबायोलोजीमध्ये पीएचडी करणारा नीरज भट. नीरज मूळचा गुजरातमधल्या उनाचा. IGIB त पीएचडीच्या सुरुवातीच्या काळात एका विषयात आवड नाही म्हणून पीएचडीचा विषय बदलला. असं चार-पाच वेळा झालं. पाचवेळा गाईड बदलले म्हणून IGIB त त्याला 'द्रौपदी' म्हणून चिडवताहेत. तो राहतो तिथून जवळच असलेल्या तिमारपूरच्या झोपडपट्टीतील मुलांना दररोज दोन तास शिकवायला तो जातो. गुजरात मध्ये असताना देखील तिथल्या डांग व दहाड जिल्ह्यातील आदिवासींना 'मश्रूम कल्टीवेशन ट्रेनिंग ' देणाऱ्या टीम मध्ये हा असायचा. आदिवासींना कमी श्रमात व बारमाही पोषक अन्न मिळावे यासाठी मश्रूम, ही याच्याच सुपीक डोक्यातून निघालेली आयडिया! पीएचडी नंतर ग्रामीण विकासासाठी त्याला स्वत:ला वाहून घ्यायचंय.
        पुण्याजवळच्या पाबळचा दीपक आडक. पाबळ मधल्या विज्ञान आश्रमात तो अकाऊटंट आहे. पाबळचा विज्ञान आश्रम शालेय शिक्षणामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना मोफत विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत करते. आश्रमाच्या एकूणच कार्याने प्रभावित होऊन दीपक इथे आलेला.
        मुरादाबादजवळच्या चितावली नावाच्या छोटया खेड्यातला गिरीराज सिरोही. बहुपेडी व्यक्तिमत्व. आयआयटी रुरकी मधून एमटेक केल्यानंतर आता तो आयएएसची तयारी करतोय. ज्या देशाचं प्राथमिक शिक्षण चांगलं,त्या देशाचं भविष्य उज्ज्वल असं त्याचं म्हणणं. मग मुद्दामच भविष्यातील प्लान्स विचारल्यावर "I don't plan, I work on plans." असं सहजच तो सांगून टाकतो.
        थायलंडचा  एंडी द्वी पुत्रा. तिथल्या स्टेट युनिवर्सिटीमधून तो मानसशास्त्रात बी.ए. करतोय.भविष्यात त्याला सायकोलोजीकल आंत्रप्रिनरशिप या क्षेत्रात काम करायचंय.
         रित्विक चटर्जी, कोलकाता. त्याच्या भाषेत 'कॅल्कात्ता'. पदव्युत्तर शिक्षणानंतर दोन वर्षे तो गांधी फेलोशिप मिळाली. गेली दीड वर्षे गुजरातेतल्या खेड्यातून काम करतोय. पुढच्या आयुष्याबद्दल कन्फ्युज असताना " आय लाईक टू कन्फ्युज " असं म्हणणारा.
         अरविंद थुम्बुर. आंध्रप्रदेशमधल्या खम्माम गावात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतोय. तिथल्या ३ ग्रामपंचायतींचा विशेष अधिकार त्याच्याकडे आहे. पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मध्ये डिग्री घेवून काम करायचे आहे.
        गब्रिएल वेन्स्तेईन. ओहिओचा. तिथं तो विद्यार्थी पत्रकार आहे. भारतातलं ग्रामीण जीवन त्याला पत्रकारितेत बद्ध करायचंय.
        हे सारे आणि थोड्याफार फरकाने यांच्यासारखेच इतर एकत्र जमले होते, भारत फिरायला,बघायला,जाणायला. संपूर्ण भारताला जाणून घेताना स्वत:लाच शोधायला. स्वत:तील सुप्त कौशल्यांना अंगी दडलेल्या संवेदनशीलतेला,सृजनशीलतेला साद द्यायला. खरंच आहे ते! महात्मा गांधींनी तरी दुसरं काय केलं होतं? रेल्वेच्या सेकंड क्लासमधून सारा भारत बघितल्यावरच त्यांना भारतातल्या अनेक प्रश्नांची तीव्रता त्यावेळी जाणवली होती. रामकृष्ण परमहंसांनीही विवेकानंदांना भारतदर्शन करायलाच सुचवले होते की!
      
        प्रवास हा माणसाच्या आयुष्यातील एक मोठा मार्गदर्शक असतो. अनेक पुस्तकांपेक्षाही भाराभर ज्ञान तो देवून जातो. साधा भारताचा मध्ययुगीन इतिहास जरी वाचला तरी कळतं की या देशानं, इथल्या विविधतेनं अगदी तेव्हापासून अनेक प्रज्ञावंतांना, दर्यावर्दींना व धर्मगुरूंना आकर्षित केलं होतं. भारताच्या संपूर्ण प्रवासाने त्यांना समृद्ध बनवलं,ज्ञानी केलं. मग यातल्या अनेकांनी या भूमीला आपलसं केल्याचे दाखलेही इतिहास सांगतो. मानवी जीवनाच्या एकूण प्रगतीत व समृद्धीत प्रवासाचं योगदान कल्पनेपलीकडलं आहे. प्रवासामुळे संस्कृती,इतिहास,कला,शिल्प,ज्ञा
न आदी गोष्टींची आदानप्रदान नेहमीच होत राहिली आहे. आपल्या सांस्कृतिक जीवनातील प्रवासाच्या ह्या योगदानामुळेच कदाचित प्रवासवर्णन हा साहित्य प्रकार सुरु झाला असावा. भारताबद्दल तर काय बोलायचं? अनेक संस्कृती,भाषा,धर्म,जाती,खाद्य,अशा वैविध्यपूर्ण गोष्टी एकाच मांडवाखाली नांदत राहिल्या आहेत. या विविधतेतही एकता असलेल्या या देशाचा प्रवास म्हणजे ज्ञान,मनोरंजन व माहितीचा संपूर्ण खजिनाच! असा प्रवास उलगडायला सोबत हवी ती आपल्यासारख्याच आवडी-निवडी असलेल्या समविचारी बोलक्या मनांची.अशा प्रवासात मग एखाद्या पुडीतून बाहेर पडावीत अशी अनेक गुपिते बाहेर पडतात. अनेक कोडी उलगडतात. आवडीच्या इतर गोष्टींची चर्चा होते. सगळ्याच विषयांवर गप्पा होतात, अगदी पुस्तकं,ठिकाणं,राजकारण,शिक्षण, सिनेमा,क्रिकेट यांपासून ते मिडिया,बॉलीवूड,सेक्सपर्यंत. खवय्येगीरीला तर प्रवासात उधा येतं. भारतप्रवास ही तर अख्ख्या भारतातील विविध प्रादेशिक पदार्थ खाण्याची नामी संधी. एखाद्या जेष्ठालासुद्धा मनाने तरुण व्हायला भाग पाडेल असा हा प्रवास असतो.

       समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे आणि स्वत:चं आयुष्य मजेत जगत भविष्यात कोणत्यातरी विधायक कार्यात योगदान द्यायचं,या हेतूनं अंत:प्रेरित असलेले हे युवक जेव्हा अशा प्रवासासाठी जमतात तेव्हा तो प्रवास,प्रवास राहत नाही. तो एक ध्यास होऊन जातो- बदलाचा,परिवर्तनाचा. आणि या साऱ्या युवक-युवतींची आशा,प्रेरणा,आदर्श व कृती नव्या बदलांची नांदी दर्शवतात. युवक या शब्दात मोठी जादू,मोठं आकर्षण भरलेलं आहे. युवक म्हणजे धाडस, युवक म्हणजे जबाबदारी आणि सामर्थ्या
चं द्योतक,युवक म्हणजे प्रचंड आत्मविश्वासाचं कोठार. देशाच्या भविष्याचा व जेष्ठांच्या विश्वासाचा कणा. आणि म्हणूनच दारिद्र्य आणि दैन्य यांत खितपत पडलेल्या भारताचं पुनरुत्थान युवकाच घडवतील असा उदंड विश्वास विवेकानंदांना होता. एवढचं कशाला,एक नवा भारत विणण्याचं काम युवकच करू शकतील असं बाबा आमटेंना वाटायचं म्हणून "युवकांनो, या युगयात्रेत भरती होण्याची सक्ती मी तुमच्यावर करतो आहे."असं म्हणत बाबांनी त्यावेळी त्यांची 'भारत जोडो' यात्रा सुरु केली होती.

       प्रवास आणि कविता यांचं तर फार जवळचं नातं आहे. दोन्हीही आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. प्रवास आणि कवितेत अजून एक साम्य आहे, ते म्हणजे या दोन्हींशी एकदा का गट्टी जुळली की मग ती जन्मभराची होऊन जाते. ग्रीक कवी कावाफीनं त्याच्या अशाच एका कवितेत अज्ञात व साहसी प्रवासाबद्दल सुंदर लिहिलंय. तो म्हणतो


As you set out for Ithaka
hope the voyage is a long one,
full of adventure, full of discovery.
Laistrygonians and Cyclops,
angry Poseidon—don’t be afraid of them:
you’ll never find things like that on your way
as long as you keep your thoughts raised high,
as long as a rare excitement
stirs your spirit and your body.
Laistrygonians and Cyclops,
wild Poseidon—you won’t encounter them
unless you bring them along inside your soul,
unless your soul sets them up in front of you.

Hope the voyage is a long one.
May there be many a summer morning when,
with what pleasure, what joy,
you come into harbors seen for the first time;
may you stop at Phoenician trading stations
to buy fine things,
mother of pearl and coral, amber and ebony,
sensual perfume of every kind—
as many sensual perfumes as you can;
and may you visit many Egyptian cities
to gather stores of knowledge from their scholars.

Keep Ithaka always in your mind.
Arriving there is what you are destined for.
But do not hurry the journey at all.
Better if it lasts for years,
so you are old by the time you reach the island,
wealthy with all you have gained on the way,
not expecting Ithaka to make you rich.

Ithaka gave you the marvelous journey.
Without her you would not have set out.
She has nothing left to give you now.

And if you find her poor, Ithaka won’t have fooled you.
Wise as you will have become, so full of experience,
you will have understood by then what these Ithakas mean.


                                                                       


                                                                                   क्रमश:

Friday 9 December 2011

अण्णा हजारेंना पत्र.

अण्णांना, 

     खरं सांगू अण्णा, चांगदेवाला तो ज्ञानदेवापेक्षा वयाने मोठा असूनही ज्ञानदेवाला पत्र लिहिताना कोणत्या वचनाने लिहावे असा प्रश्न पडला होता. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असूनही मला तो पडलेला नाही. कारण आदरणीय म्हणावे असे तुम्ही नाही आहात,एवढं मात्र खरं.  

     अलीकडील तुमची बरीचशी विधाने ही अनेकांना बेदरकार वाटताहेत मात्र आम्हाला तुमच्या (अ)संयमाची माहिती असल्याने त्यात काहीही विशेष वाटले नाही. तुमचा बेतालपणा व फटकळ बोलणं ह्यामुळे तुम्ही स्वत:च्याच लोकपाल आंदोलनाची हवा घालवलेली आहे हे सगळ्यांना आता कळून चुकले आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर हल्ला झाला आणि तुम्हाला हे कळताच पटकन तुमच्या तोंडातून बाहेर पडलेल्या "एकही मारा" या शब्दांनी तुम्ही तुमच्या खऱ्या अंतरंगाचे दर्शन साऱ्या भारताला घडवले. काही वेळानंतर तुम्हाला तुमची चूक लक्षात आल्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मिडीयाने घेतला अशी सारवासारव करू लागला व हा हल्ला पवारांवर नाही तर लोकशाहीवर आहे अशी टोटल 'बेदी'छाप वाक्ये फेकू लागला. हे सारं पाहिल्यानंतर तुमच्यावर ओढवलेल्या केविलवाण्या परिस्थितीची जाणीव झाली व तुमची कीव आली. तसा, मी शरद पवारांचा समर्थक नाहीये मात्र तुमच्या तथाकथित 'गांधीवादाचा' बुरखा फाटला हे मला इथं ठळकपणे मांडायचं आहे. अण्णा, तुम्ही कधीच 'गांधीवादी' नव्हता, आजही नाही आहात हे उघडं-नागडं सत्य आहे.

       अण्णा, परवा तुम्ही सहज म्हणाला, ( तुमचं असं का होतं कुणास ठाऊक? तुम्ही सहज म्हणायला जाता आणि जग मात्र  निराळेच अर्थ काढून बसतं - तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि मग तुम्हाला परत परत मौनात जावं लागतं ), हां तर परवा तुम्ही सहज म्हणाला की देश व समाज सुधारणेसाठी केलेली हिंसा तुम्हाला मान्य आहे. तुम्ही मग राळेगणसिद्धी मध्ये दारू पिणाऱ्या महाभागांना झाडाला उलटे बांधून कसे फटकावलेत हे नमूद केलतं. तसेच पवारांवरच्या हल्ल्याचं तुम्ही पुन्हा एकदा समर्थन केलंत. शेतकऱ्यांनी गोळीबार झेलला, तर मग कृषीमंत्र्यानं व  ज्या माणसानं भ्रष्टाचार केलाय त्यानं एक थप्पड सोसायला काय हरकत आहे असा सवालही केला. पण, अण्णा यातली खरी गोम वेगळीच आहे. हा तुमचा पवारद्वेष लहान पोरालाही स्वच्छपणे कळतोय हो. ज्या 'गांधी'चा फोटो चिकटवून रामलीलावर तुम्ही आपल्या लीलांचं प्रकट दर्शन संपूर्ण जगाला घडवलं, त्या फोटोला तरी निदान जागायचं? अहो, गांधींनी त्यांच्या शत्रूंचा-इंग्रजांचा देखील कधी द्वेष केला नाही. त्यांचा इंग्रजांना विरोध होता मात्र इंग्रजांबद्दल गांधीजींना द्वेष नव्हता. गांधीजी म्हणायचे विरोध व्यक्तीला नको तर प्रवृत्तीला करा. त्या माणसाचं जगणंच वेगळं होतं हो. गांधीजींचे प्रयोगच अंतर्शुद्धीचे होते म्हणून ते सत्याचे प्रयोग होते. मात्र तुम्ही गांधींचं नाव घेता आणि सरळसोटपणे हिंसेचं समर्थन करता. अहो, इथंच तुमच्यातला अज्ञानी गांधी दिसतोय.गांधीजींची अहिंसेबद्दल खूप चिंतन केलं होतं. त्यांची हिंसेची व्याख्या  खूप सूक्ष्म आहे. गांधीजी म्हणायचे," एखाद्याला फक्त शारीरिक मारहाण अथवा दुखापत करणे हीच हिंसा नसून त्याला आपल्या शब्दांनी दुखावणे हीदेखील हिंसाच आहे."

       अण्णा, गांधी आपल्या तत्वांसाठी जगला होता आणि त्या तत्वांसाठी त्याने कोणतीही तडजोड केली नव्हती. गांधीजींच्या मृत्युनंतर एका शोकसभेत एका व्यक्तीने म्हटले होते की ' गांधीजींनी, सत्य व अहिंसा या तत्वांना मोठं केलं'. विनोबांनी ते चुकीचे आहे असे सांगत म्हटले होते की ' सत्य व अहिंसा या तत्वांनी गांधीजींना मोठं केलं'. असं असतं तत्वांसाठी जगणं. तुमची तत्त्वं तर इथं दर आंदोलनागणिक बदलतायंत. लोकपालसाठी  गांधीवाद, आणि त्यानंतर मारामारीचा तलवारवाद. ते राहूदे, साधं स्वत:च्या खोटं बोलण्याचंसुद्धा (पवारांवरच्या हल्ल्याची नंतरची प्रतिक्रिया)  तुम्हाला काहीच वाटत  नाही. स्वत:च्या चुकीचे प्रायश्चित घ्यायचे सोडून तुम्ही त्या चुकीची सारवासारव करता त्याचवेळी तुमच्या गांधीबद्दल असलेल्या आस्थेची पोच कळते. दारू पिणारयांचा प्रश्न गांधीजींच्या वेळीही ऐरणीवर आला होता. पण म्हणून त्यांनी तुमच्या सारखी कुणाला झाडाला उलटे बांधून फटकावले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या की आपले भांडण व्यसनाशी आहे, व्यसनी माणसाशी नाही. त्याला किंवा त्याच्या मानसिकतेला इजा होईल असे काहीही करू नका.

     अण्णा,राजेश खन्नाच्या एका चित्रपटातले वाक्य आठवतंय, " It is simple to be happy but it is difficult to be simple". म्हणून सांगतो साधं बनणं एवढं सोपं नसतं. त्या दिवशी तुमच्यापेक्षा पवार जास्त गांधीवादी आणि साधे वाटलेत (नसूनसुद्धा). त्यांचा संयम वाखाणण्याजोगा होता. असुदे, तुमची चूक नाही आहे ही. कुणीतरी म्हटलेच आहे नाहीतरी, प्रसिद्धीचा वारा न लागो बापडां...

                                                                                                             
                                                                तुमचा एक परखड कटू सत्य चिंतक,  
                                                                      प्रथमेश आडविलकर.

Thursday 1 December 2011

उद्योगविश्वातला तारा..

              कुठेतरी वाचनात उपनिषदांचा संदर्भ आला होता. उपनिषदांमधलं एक संस्कृत वचन तिथे दिलं होतं. ते वचन नेमकं आता आठवत नाही. मात्र अर्थ लक्षात आहे. अर्थ असा होता "सज्जनाला नेहमी दुर्बलतेचा शाप असतो व समर्थला दुर्जनेतच वरदान असतं." मग पुढे लेखकाने सज्जन हे चारित्र्यवान असतात पण समाजात घडण्याऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी कमी पडतात किंवा अनेकदा दुर्बल ठरतात. तर जो हे सगळं करू शकेल तो 'समर्थ', दुर्दैवाने बऱ्याचदा दुर्जन कसा असतो हे मार्मिकपणे पटवून दिले होते. तसेच, शेवटी तुम्ही 'समर्थ सज्जन' बना असा गोड संदेशही दिला होता आणि मूल्यांचं   महत्व  अधोरेखित केलं होतं. हे आठवण्याचं कारण एवढंच, की मानवी मुल्ये व नैतिकतेचा हळूहळू ऱ्हास होत असलेल्या या ढासळत्या युगातही या मूल्यांना केंद्रबिंदू मानून जगणारी काही माणसं अथवा संस्था अजून आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांना "समर्थ सज्जन" म्हणावं अशी चारित्र्यवान व कार्यक्षम माणसं, अशा संस्था. टाटा उद्योगसमूह हा त्यापैकीच एक. टाटा उद्योगसमूह हा फक्त उद्योगसमूह कधीच नव्हता तर स्वच्छ  कारभार, सामाजिक बांधिलकी व मानवी मूल्यांची जपणूक यामुळे तो एक ब्रँड बनला होता. अजूनही आहे. १९९० साली जेव्हा रतन टाटांकडे या उद्योगसमूहाची सूत्रे आलीत तेव्हा समूहात एकूण १४  कंपन्या होत्या. आज त्यांची संख्या शंभरावर असून ८० देशांमध्ये त्यांचा पसारा पसरलाय. एवढा पसारा म्हणजे हे फक्त जाळं नाही तर टाटा म्हणजे एक क्लास आहे, एक ब्रँड आहे, एक standard आहे. आज युरोपातील टेटली चहा, अमेरिकेतील रिट्झ कार्लटन हॉटेल, जग्वार व लॅण्ड रोव्हर सारख्या गाड्या हा सारा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा श्रीमंती थाट ही आजच्या या 'क्लास'ची ओळख आहे.

 
          टाटा उद्योगसमुहाची सर्वाधिक सुत्रे राहिलीत ती जेआरडी टाटांकडे. ती पण तब्बल पन्नास वर्षांसाठी. त्यांच्या कालावधीत या समुहाने खऱ्या अर्थाने कात टाकली. जेआरडी द्रष्टे होते. काळाच्या पुढे चार पावलं पाहायचा त्यांचा गुण केवळ टाटा उद्योगसमुहालाच नव्हे तर भारतालाही बदलवणारा होता. आणि म्हणुनच ज्यावेळी नुकताच देश स्वतंत्र झाला होता तेव्हा जवाहरलाल नेहरू यांना देशात उत्तम अभियंते तयार व्हावेत यासाठी तुझ्याकडे काय योजना आहेत, असे विचारण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता आणि तशी काही योजना नाही, हे सांगण्याचा प्रामाणिकपणा पं. नेहरू यांच्याकडे होता. तेव्हा द्रष्टय़ा जेआरडींनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा (TIFR) पाया घातला आणि त्यातून आज देशाला अणुतंत्रज्ञानात स्वावलंबत्व देणारी यंत्रणा आणि अभियंते उभे राहिले. तीच बाब मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, बेंगलोरमधील इंडिय़न इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईतील नॅशनल सेन्टर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, टाटा मेमोरियल हॉस्पिटल अथवा पुर्वीचं एअर इंडिया यांसारख्या देशाच्या प्रगतीत भर टाकणार्या अनेक संस्था वा यंत्रणा ही टाटांची देशाला मिळालेली अनमोल देणगी आहे. 

          क्रिएटिव्ह काहीही करायचं असलं तर त्यासाठी संवेदनशीलता गरजेची असते. संवेदनशील असल्याशिवाय माणसाला नविन काही घडवता येत नाही. ही संवेदनशीलता हर क्षणी जागृत असावी लागते. मग क्षेत्र कोणतंही असो, साहित्य,कला इथंपासून ते उद्योगापर्यंत; सर्वांना हा नियम लागू. म्हणूनच भारतात कुठेतरी स्कूटरवरून निघालेल्या चारजणांच्या कुटुंबाचा प्रवास बघून मन हेलावणं आणि त्यातून जगातल्या सर्वात स्वस्त अशा नॅ
नो कारचा जन्म होणं हे कारुण्यमयी संवेदनशीलतेचंच उदाहरण आहे. टाटा उद्योगसमुहाची सृजनशीलता ही नेहमी अशीच संवेदनशीलतेतून व हलाखीचं जगणं जगणाऱ्या सामान्यजनांबद्दल असलेल्या करुणेतून प्रसवत राहिली आहे. यामुळेच अगदी सर्वसामांन्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये बनवलेला वॉटर प्युरीफायर असो वा कर्करोगाशी लढण्यासाठी मुलभूत संशोधन करणारे रुग्णालय असो; मिठापासून ते मोटारीपर्यंत भारतीयांच्या जीवनास सर्वांगाने स्पर्श करणाऱ्या या उद्योगसमुहाने अशा अनेक प्रकारे देशाच्या उभारणीसाठी मदत केलेली आहे. टाटांनी त्यांच्या ट्रस्ट्सच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो रुग्ण,विद्यार्थी, आदिवासी,वंचित इ. गरजूंना कोट्यवधींची मदत केलेली आहे. अगदी आपदग्रस्तांसाठी कायमस्वरूपी मदतदेखील या ग्रुपने केलेली आहे. 'ताज' हल्ला हे त्याचं ताजं उदाहरण. या हल्ल्यातील जखमी व मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं व रेल्वेनं आर्थिक मदत दिली. मात्र ती तुटपुंजी होती. या पार्श्वभूमीवर टाटांनी त्यांच्या वेल्फेअर ट्रस्टकडून गेली तीन वर्षे १३८ कुटुंबांना कोट्यवधींची मदत केली आहे. यांतील अनेक कुटुंबे टाटा समूहाशी काडीमात्रही संबंध नसलेली होती, हे विशेष.

           समाजाच्या व देशाच्या प्रती असलेलं हे उत्तरदायित्व हे केवळ 'ताज'सारख्या एखाद्या घटनेनं येत नसतं तर ते मुळातंच असावं लागतं. ते असणं हीच संवेदनशीलता. हे असं उत्तरदायित्व मनात येण्याची वा सहकाऱ्यांच्याही मनात रुजवलं जाण्याची प्रक्रिया टाटा उद्योगसमुहात गेल्या शंभर वर्षांपेक्षाही जास्त काळाहून अबोलपणे घडत आहे. अलीकडच्या 'वर्क-कल्चर'ने त्याला "कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी" हे नाव दिलं. पण ते कुणाच्याही स्वप्नातदेखील नव्हतं तेव्हापासून टाटा उद्योगघराण्यात ते जपलं जात आहे. अशा गोष्टी नुसत्या ट्रस्ट स्थापन करून आणि कर लो दुनिया मुठ्ठी में अशी साद घालून होत नाहीत तर कर्तृत्वाबरोबरच तिथे हवा असतो तो ओलावा, सहानुभूती व संवेदनशीलता. म्हणूनच या कर्तृत्ववान समूहाने नेहमीच संवेदनशीलता व मुल्ये यांची कावड खांद्यावरून कधीच उतरून दिली नाही. जेआरडींच्या शेवटच्या दिवसात गल्लाभरू व नफेखोर कंपन्यांची व्यवस्था जन्माला येत होती. यावर एका पत्रकाराने त्यांना प्रतिक्रिया विचारली होती, त्यावेळी जेआरडींनी म्हटले होते "Class is permanent,Form is temporary." या अशा 'क्लास'ची,एका standardची, एका संस्कृतीची धुरा आता विनम्र अशा सायरस मिस्त्रींकडे जात आहे. टाटा उद्योगसमूहाला साजेल असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे.मितभाषी,प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या सायरसना सभा, भाषणे व पेज थ्री कल्चरचे वावडे आहे. वाचन हा त्यांचा आवडता छंद आहे. सायरस हे सूर्यमंडळातल्या एका ताऱ्याचे नाव आहे. 'टाटा उद्योगसमूह'  हादेखील भारतातील उद्योगविश्वात तारा म्हणून चमकलेला आहे. आता सायरस यांना स्वत:च्या नावाप्रमाणे या उद्योगसमूहाला जगभरातील उद्योगविश्वात चमकावयाचे आहे आणि सायरस ते करतीलच.